Sunday, February 20, 2011

श्रीमद् भगवद्गीता ११

भक्तियोग


भगवंतानी प्रकट केलेल्या विश्वरूपाचे दर्शन घेतल्यावर, अर्जुनाच्या श्रीकृष्णाबद्दलच्या भावनेने त्याचे अंत:करण भरून आलं. तो पुढे विचारतो की, "जे भक्त तुझी कायम उपासना करत असतात त्यामध्ये  श्रेष्ठ भक्त कोण, हे मला सांगावं." त्यावर भगवंत म्हणतात, "जे भक्त मोठ्या श्रद्धेने माझं ध्यान करून माझी उपासना करतात, ते भक्त श्रेष्ठ होय. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आपल्या  कृतकर्माचे फळ मला अर्पण करतात अश्या श्रेष्ठ भक्तांचा मी या भवसागरातून उद्धार करतो. त्यामुळे अर्जुना तू जर स्वत:चं मन माझ्यात अर्पण केलंस तर निर्विवादपणे मलाच येऊन मिळशील."  

आपल्या बोलण्याचा ते पुढे विस्तार करतात. "इतर महत्वाचे विषय सोडून माझ्यामध्ये चित्त एकवटणे ही सोपी गोष्ट नव्हे हे सत्य आहे, पण ते कायम करत राहिल्याने शक्य होते. हे शक्य झाले नाही तर तू करशील ते कर्म, माझा प्रतिनिधी या नात्याने करत आहेस अश्या भावनेने कर, हेही शक्य झाले नाही तर, तू फक्त तू तुझे कर्मफळ मला अर्पण केल्यानेही तुला सिद्धी प्राप्त होईल."

भगवंत पुढे सांगतात, "कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान, आणि ध्यानाचा अभ्यास केल्यावर तुला कर्मफलाच त्याग सहजपणे करता येईल. असे केल्यानी तुला शांतीचाही लाभ होईल."

श्रेष्ठ भक्त कोण आहे याचे सविस्तर विवेचन पुढे भगवंत करतात, "जो कोणाचा द्वेष, मत्सर करत नाही, सगळ्यांबरोबर मित्रत्वाचे नाते राखतो, ज्याने आपल्या साधनेचा दृढनिश्चय  केला आहे, आणि ज्याने निश्चयाचे पालन कसोशीने केले आहे आणि याबरोबरच तसे करताना ज्याने स्वत:च्या मनाला गर्वाचा स्पर्शही होऊ दिला नाही तोच सर्वोत्तम भक्त आहे "

"ज्याला लोकव्यवहार आणि तत्सम गोष्टींचा कंटाळा येत नाही, आणि ज्या व्यक्तिंचा इतर लोकांनाही राग येत नाही, एखाद्या वाईट घटनेने जो अति शोकाकूल होत नाही आणि आनंदाप्रसंगी ज्याला हर्षातिरेक होत नाही, तसेच जो आपल्या कर्मफळाचा सहजपणे त्याग करू शकतो आणि निंदा-निंदा-स्तुतीच्या अनावश्यक रहाट्गाडग्यामध्ये जुंपून जात नाही असा तो स्थितप्रज्ञ  भक्तच माझा खरा सर्वोत्तम भक्त आहे आणि असा हाच भक्तियोग आहे."

Thursday, February 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता १०

विश्वरूप दर्शन

भगवंतांच्या दिव्यरूपाचे वर्णन ऐकून आनंदित झालेला अर्जुन म्हणतो, "सृष्टीमध्ये असलेल्या आपल्या स्वरूपाबद्दल ऐकून माझे अज्ञान दूर झाले, पण माझ्या मनात एक नवीनच इच्छा निर्माण झाली आहे. ती इच्छा अशी की ते आपले दिव्यरूप मला पहायला मिळावं. ते रूप जर मी पाहण्यास योग्य असेल तर कृपा करून ते मला दाखवावं.

अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमापोटी भगवंतानी त्याला आपले बहुरंगी, बहुआयामी, बहुकोनी असं दिव्यरूप दाखवण्यासाठी; अर्जुनास त्यासाठी आवश्यक असणारी दिव्यदृष्टी दिली.

हस्तिनापुरातील संजय धृतराष्ट्राला सांगतो, "ती दिव्यदृष्टी मिळताच अर्जुन पाहतच राहिला. काय पाहू आणि कशाचं वर्णन करू असं त्याला होत होतं. आकाशात हजारो सूर्य तळपत असल्यासारख ते विशारूपाच तेज होतं. असंख्य डोळे, स्वर्गीय आभूषणं, असंख्य पवित्र शस्त्रे, स्वर्गीय अश्या सुगंधाचे अत्तर, अमर्यादित असं ते पसरणारे शरीर, शेकडो बाहू, शेकडो मुखं, आणि त्या मुखात अक्राळ विक्राळ दाढा असे अनादीअनंत असं विश्वरूप दिसत होतं. मुखामध्ये सूर, असुर, ऋषीमुनी, यक्ष, किन्नर सगळंच - सगळंच त्याला दिसलं."

भगवंत त्याला म्हणतात, "या सगळ्याचा, उदय आणि अंत कधी होणार हे मी आधीच निश्चित केले आहे. अर्जुना तू तर निमित्त मात्र आहेस."

विश्वरूप दाखवणार्‍या भगवन्तांशी आपण सलगीने वागतो, त्याची चेष्टा करतो, त्याला एकेरी नावानी हाक मारतो हे आठवून अर्जुनाला काहीसा खेद झाला आणि त्याने भगवंतांची क्षमा मागितली आणि त्याना आपले सौम्य रूप पुन्हा प्रकट करण्याची विनंती केली. भगवंतांनी पुन्हा ते सौम्य रूप प्रकट केले.

विश्वरूप दर्शनाच्या शेवटी, आपलं काम निष्कामपणे आणि निरवैर भावनेने करण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला देतात. 
      

श्रीमद् भगवद्गीता ९

विभुतीयोग


स्रुष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितल्यावर आणि या स्रुष्टीचा अधिष्ठाता मीच आहे हे सांगितल्यावर भगवंत या पुढे आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करतात.

ते म्हणतात, बुद्धी, ज्ञान, नि:शंकता, सत्य, आनंद तसेच तणाव, जन्म, म्रुत्यू, अंधार, भिती, अहिंसा, दान, कीर्ती - अपकीर्ती, आपत्ती, लय या सगळ्या गोष्टी मीच बनवल्या आहेत. सप्तर्षी, चार मनु, एवढच नाही तर ही सगळी प्रजा हे माझेच अंश आहेत. मी या स्रुष्टीचा जनक आहे अशी माझ्याबद्दल भावना ठेवणारे लोक माझ्याकडे परत येतात.

यावर सामान्य जिज्ञासू सारखाच अर्जुन भगवंताना एक विनंती करतो. तो म्हणतो, "भगवान, आपण परब्रह्म आणि परमधाम आहात असे देवर्षी नारद म्हणतच आले आहेत, आणि आपणही म्हणत आहात, ऋषींच्या आणि तुमच्या सांगण्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. परंतु, आपलं हे दिव्य रूप या स्रुष्टीमध्ये ठायी ठायी सामावलेलं आहे, हे माझ्यासारख्या सामान्याने कसे समजवावे? आपलं रूप या स्रुष्टीमध्ये कुठे ठाकलं आहे याची मला जाणीव करून देण्यासाठी क्रुपया आपण त्याबाबत विवेचन करावं."

भगवंत आपल्या दैवी विभुतींचे कथन करताना म्हणतात, "देवांमधला इंद्र, रुद्रांमधला शंकर, पर्वतांमधला मेरु, घोड्यांमधला उच्चैश्रवार, हत्तींमधला ऐरावत, पशुंमधला सिंह, पक्ष्यांमधला गरूड, शस्त्रांमधलं वज्र, अक्षरांमधला आकार, यादवांमधला क्रुष्ण आणि पांडवांमधला अर्जुनही मीच आहे.
इतकंच नव्हे तर फसवणुकीच्या प्रकारात वापरलं जाणारं प्यादं देखील मीच आहे." या विभुती योगाचा शेवटी ते म्हणतात की, "या अफाट विश्वात माझाच अंश सामावलेला आहे - यापेक्षा जास्त ज्ञान तू संपादन करण्याची काहीच गरज नाहिये."